शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

अध्याय सहावा - आत्मसंयम योग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥
 
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥                    

श्रीभगवान म्हणाले
फलप्राप्तीची आस न धरता कर्मे जो करतो
तो संन्यासीकर्मयोगिहीन जो अकर्मी तो             

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥                      

जाण पांडवाएकत्व वसे सांख्य, कर्मयोगी
फलकामना त्यागल्याविना बने न कुणि योगी             

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥                             

योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते
योगारूढ झाल्यावर त्याचे शमन मूळ बनते             

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥                             

विषयासक्तीविरहित करूनी निरिच्छ आचरण
सर्व कामना त्यागी जो तो योगारूढजाण               

उद्धरेदात्मनाssत्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥                         

स्वत: स्वत:ला उध्दारावे खचून ना जाता
स्वत:चे स्वत: शत्रू असतो अन् स्वत:च भ्राता             

बन्धुरात्माssत्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥                              

स्वमन जिंकिता त्याशी जुळते बंधुसम नाते
पराजिताच्या मनांत केवळ शत्रुत्वच उरते               

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥                               

मनास जिंकी त्याचा आत्मा स्थिर शांती लाही
शीतउष्णसुखदु:खमान वा अपमानांतरिही               

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥                      

ज्ञान नि विज्ञानाने ज्याचा आत्मा तृप्त असे
त्याला ध्यात्मी योगी ही ख्याती प्राप्त असे
स्थिर बुध्दीने विजय इंद्रियांवरती मिळवोनी
दगड, माति अन् सोने याना समान तो मानी             

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥                              

जिवलग मित्रतसे बंधु, अन् उदासमध्यस्थ
साधू अथवा पापी आणिक सुष्ट तसे दुष्ट
या सर्वाना समानतेने जो साधू वागवि
त्या समबुध्दियोग्याचे स्तर विशेष सर्वस्वी                

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥                                 १० 

एकचित्त होउन योग्याने एकांती जावे
निरिच्छ राहुन पाश सोडुनी योग आचरावे               १० 

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥                          ११ 

स्वच्छ आणि मध्यम उंचीचे स्थान निवडावे
दर्भावर हरिणाजिनत्यावर वस्त्र अंथरावे                ११ 

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥                        १२ 

अशा आसनावरी बसावे आवरुन चित्तेंद्रियां
आत्मशुध्दिस्तव करण्यासाठी उचित योगक्रिया           १२ 

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥                      १३ 

पाठमानअन् डोके ठेवुनि ताठबसावे स्थिर
अविचलितलावुनि नाकाच्या अग्रावर नजर              १३ 

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥                     १४ 

भीतिमुक्त अन् शांत मनाने ब्रह्मचर्य पाळावे
आणिक माझ्या ठायी अपुले मन केंद्रीत करावे           १४ 

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥                         १५ 

अशा प्रकारे करण्याने योगाचे आचरण
माझ्याशी एकरूपतेचे मिळेल निर्वाण                   १५ 

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥                         १६ 

अति खाणेकाही ना खाणेअति निद्राजाग्रणे
योगसिध्दि न होण्यामागे ही सारी कारणे                १६ 

युक्ताहारविहारस्य  युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥                         १७ 

था उचित आहार विहार अन् माफक विश्रांती
यांचे अवलंबन केल्याने सुखद योगप्राप्ती                १७ 

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥                      १८ 

मना आवरुन आणिक राहुन आत्म्याशी निष्ठ
उपभोगाप्रत निरिच्छ बनतो म्हणति त्यास युक्त                १८ 

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥                       १९ 

वारा नसता जशी दिव्याची वात संथ तेवते
मन आवरता योग्याचेही ध्यान स्थिर बनते              १९ 

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥                       २० 

बध्द मना योगाभ्यासाने उपरति होते जधि
स्वत:स बघुनी स्वत:त, आत्मा होतो आनंदी             २० 

सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥                          २१ 

जेव्हा त्या इंद्रियांपलिकडिल असीम सौख्यात
स्थिरावतो योगी, तो होतो कधिहि न तत्वच्युत           २१ 

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥                    २२ 

ज्या स्थितीमधि अधिक सुखाचा लोभ न तो धरतो
वा अति दु:खद घटनेनेही विचलित ना होतो                   २२ 

तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥                     २३ 

असा दु:खसंयोगवियोगच योगम्हणुनि ज्ञात
कंटाळा न करावा याचे पालन करण्यात                 २३ 

सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥                              २४ 

मनोवासना पूर्णपणाने टाकाव्या त्यागुनी
इंद्रियांस आवर घालावा आपण चहुकडुनी                २४ 

शनैः शनैरुपरमेद् बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥               २५ 

धैर्य बाळगुनि हळू हळू मग बुध्दि शांतवावी
आत्म्यामध्ये मन गुंतवुनी चिंता न करावी              २५ 

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥                           २६ 

चंचल मन जर स्वैर व्हावया होइल अनावर
निश्र्चयपूर्वक आत्म्यातच त्या बांधावे सत्वर             २६ 

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥                               २७ 

असे मनाला शांत करूनच युक्तयोगी मिळविती
दोषमुक्त निष्पाप ब्रह्ममय उत्तम सुखप्राप्ती             २७ 

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥                              २८ 

अशा प्रकारे पापमुक्त अन् आत्मतुष्ट योगी
ब्रह्ममीलनामधि मिळणारे अतीव सुख भोगी            २८ 

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥                                २९ 

आत्मा ज्याचा योगयुक्त तो समदृष्टी राही
सर्व जिवांमधि स्वत:स्वत:मधि सर्व जीवां पाही          २९ 

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥                      ३० 

मी सर्वांभूतीअन सारे मम ठायी मानतो
अशास मी ना अंतरतोना तो मज अंतरतो              ३० 

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥                            ३१ 

एकत्वाने सर्वांभूती असलेल्या मज भजतो
तो योगी रत नितकर्मीं तरि मज ठायी वसतो               ३१ 

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥                      ३२ 

स्वत:सारखे सर्वां लेखी सुखात वा दु:खात
अशा युक्त योग्याची गणना सर्वोत्कृष्टात               ३२ 

अर्जुन उवाच ।
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥              ३३ 

अर्जुन म्हणाला
हे मधुसूदनसमत्वतेचा योग तुवां सागितला
चंचलतेमधि टिकण्याजोगा मला न जाणवला             ३३ 

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥                           ३४ 

चंचल मन हे बलिष्ठ असतेकठिण तया रोखणे
जसे कुणाही अशक्य असते वा~याला बांधणे             ३४ 

श्रीभगवानुवाच ।
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥                        ३५ 

श्रीभगवान म्हणाले
यात नसे शंका, चंचल मन दुष्कर वळवाया
पण, अभ्यासाने, वैराग्याने बधेल, कौंतेया                ३५ 

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥                        ३६ 

मनावरी ताबा नसला तर योग हा अशक्य
प्रयत्नपूर्वक मिळवुनि ताबा योगप्राप्ति शक्य             ३६ 

अर्जुन उवाच ।
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥                  ३७ 

अर्जुन म्हणाला
असुनहि श्रध्दा यत्नाअभावी योगातुन ढळतो
हे श्रीकृष्णा, नर ऐसा मग कुठल्या गतीस जातो ?                  ३७ 
 
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥                           ३८

ब्रह्मप्राप्तिमार्गातुन भ्रष्ट अन् गोंधळलेला तो
नभात फुटल्या मेघापरी का तोहि नष्ट होतो ?                      ३८ 

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥                       ३९ 

संशय हा माझा, भगवंता, तुम्हीच दूर करा
निरसन करणारा तुम्हाविण नसे कुणी दुसरा             ३९ 

श्रीभगवानुवाच ।
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद् दुर्गतिं तात गच्छति ॥                  ४० 

श्री भगवान म्हणाले
इहलोकी वा परलोकिही तो नष्ट नाहि होत
कल्याणप्रद कर्में करि त्या दुर्गति ना प्राप्त              ४० 

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥                            ४१ 

पुण्यकर्म करणाऱ्यांजैसा तो स्वर्गी जाई
दीर्घकाळ राहुनी तिथे मग पुनर्जन्म घेई
पुनर्जन्मही अशा घरी जे शुध्द नि श्रीमंत
योगभ्रष्ट असुनिही असा तो ठरे भाग्यवंत               ४१ 

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥                            ४२ 

किवा बुध्दीवंत योगि या घरी जन्मा येई
जन्म असा अतिदुर्लभ, पार्था, ध्यानी तू घेई              ४२ 

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥                            ४३ 

या जन्मीहि मिळे तया गतजन्मामधले ज्ञान
ज्यायोगे तो मिळवू पाहिल सिध्दी, कुरूनंदन             ४३ 

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥                               ४४ 

पूर्वजन्मिच्या ज्ञानाने तो जिज्ञासू होई
योगाकर्षण त्याला वेदांपलीकडे नेई                     ४४ 

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥                        ४५ 

जन्मोजन्मी प्रयत्न करूनी पापमुक्त होत
सिध्दी मिळुनी योगी तो मग जाई शांतिप्रत             ४५ 

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥                   ४६ 

तपस्व्याहुनी, विद्वानाहुनि, कर्मठांहुनी श्रेष्ठ
योगी असतो असा, पार्थ, तू योगी बनणे इष्ट             ४६ 

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥                    ४७ 

अशा सर्व योग्यात ठेवुनि श्रध्दा मजलागी
भजतो जो मज त्यास मानि मी सर्वोत्तम योगी           ४७ 

इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥  

अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
आत्मसंयमयोग नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला. 
**********

९ टिप्पण्या:

  1. श्री सुभाष फडके यांनी वि-पत्राद्वारे पुढील अभिप्राय कळवला आहे:

    "मुकुंदजी कर्णिक,

    आपण गीतेचा जो भावानुवाद करताहात त्याविषयीच्या माझ्या पूर्वींच्या प्रतिक्रियांमधील सूर कायम ठेवत सहाव्या अध्यायाविषयी काही निरीक्षणे.

    श्लोक २ च्या मराठीकरणात आपण सांख्य हा शब्द वापरला आहे, तो मूळ संस्कृतमध्ये नाही आहे. येथे 'ज्याला संन्यास म्हणतात तोच योग आहे' असे सांगितले आहे.

    श्लोक ३मध्येही मूळ संस्कृतमध्ये जे सांगितले आहे ते प्रकट होत नाही. योगावर आरूढ होण्याची इच्छा ठेवणाऱ्याला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू (कारण) सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर संकल्पांचा अभाव (शम) तोच कल्याणाला कारण सांगितला आहे.

    श्लोक ६ 'पराजिताच्या मनात केवळ शत्रुत्वच उरते' असा भाव नसून ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला नाही आहे, त्याचे मन हेच त्याचा सर्वात मोठा शत्रू असते असा भाव आहे. मन जिंकले, ताब्यात असले तर त्याच्यासारखा मित्र नाही आणि तसे नसले तर त्याच्यासारखा शत्रु नाही, असे सांगायचे आहे.

    मला वाटतं काव्यबद्ध करण्याच्या तसेच यमक आणि प्रास जुळविण्याच्या प्रयत्नात मूळ अर्थापासून लक्ष थोडे विचलित होत असावे. आपण अतिशय अवघड काम करीत आहात. ते करताना किती कष्ट असतील, हे साध्यासुध्या माणसाला समजणार नाही.

    यापुढचे ओळीनी पंधरा श्लोक एकदम छान.

    २२ व्या श्लोकात 'ज्या स्थितिमधि अधिक सुखाचा लोभ न जो धऱतो' असे आपण लिहिले आहे. येथे भाव जरासा वेगळा आहे. ही स्थिती लाभल्यावर अन्य कोणत्याही वस्तूचा लाभ त्यापेक्षा खालच्या दर्जाचा वाटतो. लोभ न धरणे वेगळे आणि त्या उच्च स्थितीत संतुष्ट, समाधानी असणे वेगळे.

    त्यानंतर श्लोक २७ पर्यंत पुनः अतिशय सुंदर

    श्लोक २८ उत्तमच आहे, पण त्यामध्ये 'आतीव सुख' असा शब्द वापरला आहे, तो 'अतीव' पाहिजे होता का? का रचना गेय करण्यासाठी लघु-गुरूंच्या जुळवाजुळवीचा तो एक भाग आहे.

    ३१ व्या श्लोकात 'वागुनी कसाही' हे शब्दसुद्धा जरा खटकले. तो योगी सर्व व्यवहार करत असला तरी माझ्यातच स्थित आहे असे सांगायचे आहे. 'कसाही' या शब्दात जरा निगेटिव्ह सेन्स आहे, स्वैरपणाचा भाव आहे.

    त्यानंतर पुढे सर्व परफेक्ट आहे. शेवटच्या श्लोकात 'सर्व 'कर्म'योग्यात ठेवुनि' या शब्दांमध्ये पुनः लघु-गुरूंच्या जुळवाजुळवीचा भाग म्हणून 'कर्म'योग्यात असा शब्द टाकला आहे का? येथे सर्व प्रकारचे म्हणजे, ज्ञान, कर्म, भक्ती वगैरे योगी अभिप्रेत आहेत आणि त्यातला जो श्रद्धावान आहे, तो मला सर्वश्रेष्ठ वाटतो असे भगवंत सांगत आहेत.

    मुकुंदजी, सहावा अध्याय हा माझा फार आवडता अध्याय आहे. त्यामुळे पूर्वीच्या अध्यायांपेक्षा मी जरा जास्तच विश्लेषण केले.

    अहो, मी एक विद्यार्थीच आहे, कोणी डुढ्ढाचार्य नाही. आपला भावानुवाद अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण व्हावा ही माझी इच्छा आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका.

    धन्यवाद
    सुभाष फडके

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सुभाषजी,
      आपण इतक्या त्वरेने आपले निरिक्षण कळवलेत त्याबद्दल धन्यवाद. आवश्यक तेथे मुद्रणदोष सुधारले आहेत. बाकी आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्वस्थतेने विचार करून माझे विचार आपल्याला कळवेन.
      मुकुंद कर्णिक

      हटवा
  2. डॉ. प्रियंवदा कोल्हटकर यांनी विपत्र पाठवून पुढीलप्रमाणे कळवले आहे.

    "आपल्या या सुंदर भाषान्तरामुळे गीता समजून घेणे सोपे वाटतेय. पण नेहमीप्रमाणे माझी एक छोटीशी शंका आहे. नवव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सुष्ट व दुष्ट दोघांशीही सारखेच वागणे शक्य आहे काय?"

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रियंवदाजी,

      धन्यवाद. अशा प्रकारे सुष्ट आणि दुष्ट यांच्याशी सारखेच संबंध ठेवणे किंवा दोघांशीही सारखेच वागणे जनसामान्यांना शक्य होणार नाही. किंबहुना त्यांनी तशी वर्तणूक ठेवली तरी ती वरपांगी असेल. पण इथे भगवंताना अपेक्षित आहे तो सामान्य माणूस नव्हे तर सर्वांविषयी समभाव बाळगणारा योगी, ज्याला ते समबुद्धी असे संबोधतात, आहे. अशा व्यक्तीला ते शक्य आहे. म्हणूनच तर भगवंत त्याची पातळी सर्वात वरची, उच्च ठरवतात.

      मुकुंद कर्णिक

      हटवा
  3. सुभाषजी,

    अहो गैरसमज कसला? उलट माझा भावानुवाद अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण व्हावा ही इच्छा आपण बाळगता आहात हा माझ्यावर एक प्रकारे अनुग्रहच आहे.

    श्लोक २ :
    यामध्ये 'संन्यास' यासाठी वापरलेला 'सांख्य' हा शब्द :
    माझ्या माहितीप्रमाणे सांख्य' हा 'संन्यास' याचा समानार्थी शब्द आहे. दोन्हीचा अर्थ 'सोडून देणे' किंवा 'त्याग करणे' असा आहे. अर्जुनाला त्याचे 'युध्द करणे' हे क्षत्रियकर्म सोडून संन्यास घेण्याची म्हणजे सांख्य ही निष्ठा अवलंबण्याची इच्छा झाली होती ती कशी उचित नाही आणि कर्म हे केलेच पाहिजे, फक्त ते फलाशाविरहित असावे (कर्मयोग) हे त्याच्या मनावर बिंबवून त्याला युध्द करण्यासाठी प्रवृत्त करावे या हेतूने भगवंतांनी गीता सांगितली. गीतेमध्ये जेव्हा भगवान अर्जुनाला 'तू योगी बनणे इष्ट' असे सांगतात तेव्हा तू संन्यासी बन असे सांगत नाहीत. म्हणजे योग हा शब्द ते कर्मयोग याअर्थी वापरतात हे स्पष्ट आहे. संन्यास हाच योग आहे असे जर भगवन्ताना सांगायचे असते तर पुढे युध्दकर्म करायला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. तथापि, परिणामांची चिंता न करता निष्काम कर्म करणे म्हणजेच कर्माच्या फलाची आशा सोडणे हा त्याग करणेच आहे म्हणून संन्यास (सांख्य) आणि (कर्म)योग यांत एकत्व आहे असा भावार्थ मला दिसला.

    श्लोक ३:
    गीतेमध्ये भगवंताना अपेक्षित योग हा कर्मयोग आहे हे समजल्यानंतर कर्मयोगावर आरूढ व्हायला म्हणजे तो अंगिकारायला कारण कर्म असते हे उघडच आहे. आणि कर्मयोग अंगिकारला म्हणजे मग आरंभलेल्या कर्माची ते मध्येच सोडून न देता पूर्णता करणे हेही आलेच. इथे शम म्हणजे अभाव असे नसून शांत करणे किंवा निवारण करणे असा मी घेतला आहे.

    श्लोक ६:
    पराजित या शब्दाचा थोडासा घोटाळा वाटणे साहजिक आहे. परंतु पहिल्या चरणात सांगितल्याप्रमाणे आत्म्याला (याला मी स्वमन म्हटले आहे. आपल्याला सर्वसाधारणपाणे मनावर ताबा मिळवणे, मन ताब्यात ठेवणे अशी भाषा माहीत असते.) जिंकण्याची भाषा आहे. इथे आपले मन आणि आपण यांत जणू काही झटापट चालू आहे आणि आपल्याला त्यात जिंकायचे आहे आणि आपण त्याला जिंकले तर मग ते जिंकलेले मन शांत होते किंबहुना आपले त्याच्याशी बंधूसारखे नाते जुळते. परंतु जर आपण जिंकू शकलो नाही म्हणजेच या झटापटीत आपण मनाकडून पराजित झालो तर त्याचे आणि आपले जुळत नाही व झटापटीतली प्रतिस्पर्धा किंवा शत्रुत्व तसेच रहाते म्हणजे झटापट चालूच रहाते.

    श्लोक २८:
    आतीव :
    हो. हा 'टंकणखार' (मुद्रणदोष) होता. 'अतीव' असा अपेक्षित असलेला शब्द घातला आहे. असाच एक दोष ४६व्या श्लोकातही होता. 'विद्वावानाहुनि' असा प्रयोग झाला होता. तो 'विद्वानाहुनि' असा बदलला आहे.

    श्लोक ३१:
    'वागुनी कसाही' हा शब्दप्रयोग:
    मान्य. हा शब्दप्रयोग बदलायला हवा हे पटले. दुसरा चरण आता 'तो योगी रत नित कर्मीं, तरी मज ठायीं वसतो' असा केला आहे.

    श्लोक ४७:
    'अशा कर्मयोग्यात..'
    श्लोक २ च्या खुलाश्यात लिहिल्याप्रमाणे माझी धारणा जी 'भगवंताना अर्जुनाकडून अवलंबण्यास अपेक्षित हा कर्मयोगच आहे' त्या धारणेप्रमाणे मी तसा शब्द प्रयोग केला होता. परंतु आपल्याला आलेली शंका इतर वाचकांनाही सतावेल हे लक्षात घेऊन आता 'अशा सर्व योग्यात' असा बदल केला आहे.

    ज्या आपुलकीने आपण माझ्या या लेखनावर भाष्य करता तिच्याबद्दल मी आपला ऋणी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.

    मुकुंद कर्णिक



    उत्तर द्याहटवा
  4. श्री मुकुंद नवरे कळवतात:

    श्री. मकुंदराव कर्णिक यांना ,
    सप्रेम नमस्कार. आपण करत असलेला हा श्लोकबद्ध भावानुवाद वाचून गीतेतील तत्वज्ञान वाचकाला सहज कळेल यात शंका नाही . हा सहाव्या अध्यायात मला आपण अनुवादित केलेले श्लोक क्र. ७, ८, ९, १९, २९, ३४, ४१, ४४ विशेषेकरून आवडले.

    (मला वाटले की आपण क्र. १५, २३, २५ यावर गेयतेसाठी एकवार विचार करावा तसेच क्र. ३२ मधे 'सर्वोत्कृष्टात' अशी सुधारणा व्हावी. मी असे काही सुचवावे की सुचवू नये असा विचार नेहमी मनात येतो पण मला राहवत नाही आणि मित्रत्वाच्या नात्याने लिहितो तरी कृपया राग नसावा.)

    आपला
    मुकुंद नवरे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सप्रेम नमस्कार.
      अवश्य सुचवत चला. आपण नियमितपणे माझे लेखन वाचता तेव्हा आपोआपच आपल्याला तो अधिकार प्राप्त होतो. आपल्या सूचनांचे माझ्याकडून स्वागतच होईल याची खात्री बाळगावी.

      आपण ३२ व्या श्लोकात सुचवलेला बदल केला आहे.

      धन्यवाद.
      मुकुंद कर्णिक

      हटवा
  5. श्री सुभाष फडके कळवतात:

    "श्री. मुकुंदजी कर्णिक,

    आपण सांख्य हा शब्द संन्यास या शब्दाला समानार्थी असा योजता आहात. सांख्ययोग आणि सांख्यदर्शन यातला फरक मी नीट समजलो नव्हतो, त्यामुळे माझा घोटाळा झाला. माझ्या माहितीप्रमाणे सांख्यदर्शनात पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही भिन्न आहेत असा द्वैतवाद सांगितला आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग असे नाव दिले आहे. सांख्ययोग म्हणजे मी कर्ता हा अभिमान सोडून देणे(दुसऱ्या शब्दात संन्यास. दर्शन हा सिद्धांताचा (थियरी) तर योग हा प्रत्यक्ष करण्याचा (प्रॅक्टिस) भाग आहे. त्यामुळे सांख्य हा शब्द संन्यास या शब्दाला समानार्थी योजणे बरोबर आहे. परंतु माझ्यासारख्याचा गोंधळ होतो. त्यात तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञानकर्मसंन्यासयोग, पाचवा कर्मसंन्यासयोग अशी नावे असल्यामुळे अजूनच गोंधळ. असो. त्या निमित्ताने या शब्दांचा सखोल अभ्यास झाला हा फायदाच आहे.

    तिसऱ्या श्लोकाविषयी अजून उहापोह आवश्यक वाटतो.

    योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते।
    योगारूढ झाल्यावर त्याचे शमन मूळ बनते।।

    यावरून असे लक्षात येते की आपण कारणम् या संस्कृत शब्दासाठी मूळ हा शब्द मराठी भावानुवादात वापरला आहे. खरं पाहता कारणचा अर्थ साधन असा आहे. योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते असा भाव नसून योगी होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाला (निष्काम) कर्म करणे हे शमाचे (चित्त शांत होण्याचे) साधन सांगितले आहे आणि एकदा तो योगारूढ झाला की कर्म आणि शम यांचा कार्यकारणभाव बदलतो आणि शम हे कर्माचे कारण बनते. गीता प्रेस गोरखपूर (जयदयाल गोयंदका) यांची मराठी गीता आणि लो. टिळकांचे गीतारहस्य हे संदर्भासाठी पाहिल्यास मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल.

    खरं पाहिलं तर मूळ अर्थाला धक्का न लागू देता हे मराठीत आणणे म्हणजे मोठीच कसरत आहे. एका श्लोकावर भाष्यकारांनी पानेच्या पाने लिहिली आहेत आणि ते सर्व पुनः एकाच मराठी श्लोकात व्यक्त करणे खरोखर अवघड काम आहे. टीका करणे सोपे असते, परंतु प्रत्यक्ष भावानुवाद करणे महाकठीण हे मला चांगले समजते.

    आपण करीत असलेल्या भावानुवादासाठी मी पुनः एकदा आपले आभार मानतो. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

    सुभाष फडके"

    उत्तर द्याहटवा